पुणे : महाराष्ट्र सरकारने एकीकडे जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते, मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत संस्था, पालक यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस सुरू करण्यावर जुलै महिन्यात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नियोजन करून १५ ऑगस्टनंतर शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी होणार याकडे पालक, विद्यार्थी म्हणून शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. शिक्षण विभागाने १५ जूनपासून ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरु केले होते, पण त्यात विरोध होत असल्याने ऑनलाईन, दूरदर्शन, प्रसारभारतीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे यासह विरोध होत आहे. असे असताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन ५.० असणार आहे, अशी घोषणा शनिवारी (ता.३०) केली. यामध्ये शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस जून महिन्यात बंदच असणार आहेत.
जुलै महिन्यात राज्य सरकार यासंदर्भात शाळा, पालक, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये कसे भरवायचे याचा निर्णय करेल असे नमूद केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरू करताना सोशल डिस्टन्स, स्वच्छता, विद्यार्थी सुरक्षा याचा विचार करून कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाशी सल्लामसलत केल्यानंतरच याचा निर्णय घेता येईल. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला जुलै महिन्यात निर्णय घेताना कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी, तेथील विद्यार्थी वाहतूक, शाळा याचाही सखोल विचार करावा लागणार आहे. त्यानंतरच शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे यंदा शाळेची घंटा १५ ऑगस्टनंतरच वाजण्याची शक्यता आहे.
*◼महाविद्यालयांचा मुहूर्त हुकणार?*
'यूजीसी'च्या निर्देशाप्रमाणे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र आता सुरक्षेची खबरदारी घेऊन याबाबत जुलै महिन्यात निर्णय घ्यायचा असल्याने राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.