कोल्हापूर प्रतिनिधी:-
येत्या रविवार दिनांक 21 जून 2020 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे , ज्येष्ठ अमावस्या मध्ये होणारे हे कंकणाकृती सूर्यग्रहण 2020 या सालातील भारतातून दिसणारे पहिले सूर्यग्रहण आहे, यापूर्वीचे 2019 सालातील 26 डिसेंबर 2019 चे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून म्हणजेच केरळ कर्नाटक व तामिळनाडू मधून दिसले होते त्यानंतर लगेचच सहा महिन्यांनी 2020 सालातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर भारतातून दिसणार आहे, सदरचे सूर्यग्रहण पृथ्वीवर तब्बल पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे चालणार आहे ,तर फक्त भारतात 3 तास 25 मिनिटे चालणार आहे, 21 तारखेला सकाळी चंद्राच्या सावलीचा प्रथम स्पर्श पृथ्वीवरून सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक येथे होणार आहे , त्यानंतर ती 21 किमी रुंदीची सावली कोंगो, इथिओपिया , पाकिस्तानचा दक्षिण भाग, उत्तर भारत, चीन , व चीनच्या पूर्व समुद्रात जाऊन पुढे अवकाशात जाईल, सदर सूर्यग्रहणाची 33 सेकंद कालावधीची कंकणाकृती अवस्था भारतातील (राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड ) मसूरी , टोहान, चमोली, कुरूक्षेत्र व डेहराडून या भागातून दिसेल, या कंकणाकृती पट्ट्याच्या उत्तरेला व दक्षिणेला कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण भारतातून खंडग्रास अवस्थेत हे सूर्यग्रहण दिसणार आहे, 26 डिसेंबर 2019 रोजच्या दक्षिण भारतातील कांकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून खगोलप्रेमींचे व अभ्यासकांचे बरेच गट दक्षिण भारतात गेले होते, परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमी वर प्रत्यक्ष राजस्थान हरियाणा उत्तराखंड मधील ग्रहण पट्ट्यामध्ये अत्यल्प खगोलप्रेमी हजेरी लावतील असे वाटते, जागतिक पातळीवर हे ग्रहण सकाळी 9:16 वा सुरु होणार
असून दुपारी 02:28 वा , संपणार आहे, त्याच प्रमाणे कोल्हापुरातून हे ग्रहण खंडग्रास अवस्थेत सकाळी 10:03 वा, सुरू होणार असून दुपारी 01:28 वा, संपणार आहे, कोल्हापूरातून खंडग्रास अवस्थेचा ग्रहण मध्य 11:39 वाजता आहे, ग्रहण मध्य म्हणजे चंद्राने सूर्याला जास्तीत जास्त झाकणेचा काळ, 21 जूनच्या सूर्य ग्रहण काळात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळी हंगामामुळे ढगाळ वातावरण असेल, परंतु ग्रहण मध्य काळात म्हणजेच सकाळी 11:39 वाजता कोल्हापूर जिल्हा परिसरातील आकाश निरभ्र असावे अशी अपेक्षा करूया, भारताची राजधानी दिल्लीतून 99% दिसणारे हे ग्रहण कोल्हापुरातून फक्त 37 टक्के दिसणार आहे, दर सहा महिन्यांनी वसंत संपात किंवा शरद संपात या काल्पनिक बिंदूवर सूर्य पृथ्वी चंद्र एका रेषेत आले तरच ग्रहणे घडतात, सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून पौर्णिमेला चंद्रग्रहण घडते , तसेच सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये अमावस्येला चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवरील छोट्याशा भागावर 200 ते 250 किलो मीटर रुंदीचा सावलीचा पट्टा तयार होतो , त्या पट्ट्यातील गावांमधून खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते व त्या पट्ट्याच्या दक्षिण व उत्तर भागात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते, पौर्णिमेदिवशीच होणारी चंद्रग्रहणे तीन प्रकारचे असतात, खग्रास खंडग्रास आणि छायाकल्प, तसेच अमावस्येच्या दिवशीच होणारी सूर्यग्रहणे एकूण 3 प्रकारची असतात , खग्रास , खंडग्रास आणि कंकणाकृती, चंद्र पृथ्वीपासून जवळ असेल म्हणजेच उपभू स्थितीत असेल तर तो सूर्याला पूर्ण झाकू शकतो व खग्रास सूर्यग्रहण लागते, चंद्र जर पृथ्वीपासून दूर अंतरावर म्हणजेच अपभू स्थितीत असेल तर चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही , सूर्याची भोवतालची कडा उघडी राहते आणि सूर्य बागडी सारखा दिसतो, म्हणून त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात, किंवा इंग्रजीत त्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात, कंकणाकृती अवस्थेत चंद्राची गडद सावली पृथ्वीवर पडत नाही परंतु चंद्राची पडछाया पृथ्वीवर पडते, कोणत्याही ग्रहणाचा ग्रहण काळात, ग्रहण काळ आधी व ग्रहण काळानंतर पृथ्वीवरील सजीवांवर कोणत्याही प्रकारचा चांगला अथवा वाईट परिणाम होत नाही , त्यामुळे वेध किंवा पथ्य कोणीही पाळण्याची गरज नाही, सर्व प्रकारची चंद्रग्रहणे उघड्या डोळ्यांनी पाहायला हरकत नाही, परंतु सर्व प्रकारची सूर्यग्रहणे सौर चष्म्यातूनच पहावीत, आणि दुर्बिणीतून किंवा द्विनेत्रीतून पाहायची असल्यास दुर्बिणीला किंवा द्विनेत्रीला मायलर फिल्म लावलीच पाहिजे, फिल्म न लावल्यास किंवा उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहणे पाहिल्यास डोळा कायमचा निकामी होऊ शकतो, विविध व बहुतांश प्रसार माध्यमे वेध व पथ्य पळायला सांगतात, सध्याच्या विज्ञान युगामध्ये किमान प्रसारमाध्यमांनी तरी लोकांना पथ्य पाळायला न सांगण्याचे पथ्य पाळावे व आपले प्रसार माध्यम विज्ञानवादी आहे याचा कृतीतून पुरावा द्यावा, प्रत्येक ग्रहणा वेळी वेध व पथ्य पाळल्यामुळे जीव गमावणाऱ्याची संख्या भरपूर आहे , परंतु परंपरा पाळणारा समाज या मृत्युवर काहीही बोलत नाही, गुणसूत्रातील दोषामुळे बाळामध्ये व्यंग निर्माण होते परंतु त्या व्यंगाचे खापर अंधश्रद्ध समाजाकडून ग्रहणाच्या माथ्यावर फोडले जाते, पृथ्वीवरील सर्व मानव जातीने ज्योतिषांनी व विविध प्रसारमाध्यमांनी घातलेली भिती झुगारून योग्य ती खबरदारी घेऊन खगोलीय व दुर्मिळ अविष्कार असलेली सर्व प्रकारची ग्रहणे पाहण्याचा आनंद घ्यावा

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.