कोल्हापूर प्रतिनिधी 1 जून : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कुदनूर गावात तर रस्त्यांना अक्षरश: तळ्याचं स्वरूप आलं होतं. रस्त्यावरून एक फुटापेक्षाही जास्त पाणी वाहत होतं. उतारावर जी घर होती त्यातल्या अनेक घरांमध्ये हे पावसाचे पाणी शिरलं आहे. सध्या या भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली असून पहिल्यांदाच या गावात अशा पद्धतीने ढगफुटीसदृश्य असा पाऊस झाला आहे.
कोल्हापूरसह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. शिवाय शेतीच्या पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला सुद्धा मोठा दिलासा मिळाला. एकीकडे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे गावातील शेतकऱ्याचा तर उभ्या शिवारातील 3 एकर ऊस जमीनदोस्त झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली,तर जवळपास गावातील तीस घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला. म्हाळुंगे गावातील 20 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.