वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कुख्यात गुंड विकास दुबेची कानपूरमधील ३० वर्षांची दहशत आता संपली आहे. मात्र ज्या प्रकारे पोलिसांनी दुबेचा एन्काऊंटर केला त्यानंर आता सामन्य जनतेकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या प्रश्चांची उत्तरं पोलिस प्रशासनाला आणि सरकारला द्यावी लागणार आहेत.
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची बातमी पुढे येत आहे. त्यानंतर विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी चेकअप केलं असता त्याला मृत घोषित केलं गेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर या ११ प्रश्नांची उत्तर कोण देणार?
1 कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदीरातून अटक करण्यात आली. मंदिर परिसरात त्याने मीच कानपूरवाला विकास दुबे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड केली. मग त्याने जर आत्मसमर्पण केलं होतं तर मग तो कानपूरला जात असताना पळून का जाईल? विकास दुबेने आत्मसमर्पण केलं की अटक झाली? असा सवाल उपस्थित होत आहे.
2. वरिष्ठ अधिकारी गाड्यांच्या ताफ्यात विकासला घेऊन जात होते. एवढा मोठा आरोपी जर गाडीत असेल… मग त्यांनी आपले पिस्तूल एवढ्या असावधरित्या बाळगण्याची चूक कशी काय केली? 3. विकास दुबेनं पोलिसांचं पिस्तूल घेऊन फायरिंगचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मग जर एवढा मोठा गुन्हेगार गाडीत असेल तर पोलिसांनी त्याचे हात बांधले नव्हते का?
4. आत्मसमर्पण केल्यावर दुबे मोठ्याने “मैं हू विकास दुबे… कानपूरवाला” असं जोरजोरात ओरडत होता. पोलिसांकडून अटक झाल्यानं आता आपला एन्काऊंटर केला जाणार नाही, असं दुबेला सूचित करायचं होतं का?
5. 8 पोलिसांच्या हत्या प्रकरणात अनेक पोलिसांनी मदत केल्याचं दुबेनं सांगितलं होतं. या प्रकरणाचा उलगडा होईल यासाठी हा एन्काऊंटर झाला का? एन्काऊंटर करून नेमकं कुणाला वाचवायचं होतं?
6. उत्तर प्रदेशात कर्फ्यू असतानाही विकास दुबेला मध्य प्रदेशात पोहोचविण्यात नक्की कुणाचा हात होता?
7. एवढ्या वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात वावर असलेला विकास व त्याची टोळी इतक्या दिवस कुणाच्या आश्रयास होती?
8. विकास दुबेवर राजकीय वरदहस्त होता, मात्र हा राजकीय वरदहस्त नेमका कुणाचा होता याची उकल आता कशी केली जाईल?
9. आरोपींचा एन्काऊंटर होणार असेल तर या प्रकरणाशी संबंधीत व्यक्तींना शिक्षा कशी केली जाणार?
10. विकास दुबेचं नेमकं राजकीय कनेक्शन काय होतं? त्याला नेमका कुणाचा सपोर्ट होता की ज्याच्यामुळे त्याने संपूर्ण 30 वर्ष दादागिरी केली. अनेकांच्या जमिनी बळकावल्या… खंडणी घेतल्या… खून केले?
11. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर कायद्याच्या राज्यात अश्या प्रकारचे एन्काऊंटर होणार असतील तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडणार नाही का? चौकशी होण्याच्या अगोदरच एन्काऊंटर केला जातोय, हा नवा पायंडा तर पडत नाही ना? कारण हैदराबाद प्रकरण नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे, असे प्रश्न लोक आता विचारू लागले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.