वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता पुढे काय असा सवाल सर्वांना पडला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक-२ चे संकेत दिले आहेत. ३१ जुलैनंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असं सांगितलं.
“मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाऊन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैनंतरच धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. “निर्बंध शिथील होतील, तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील.” “केंद्र सरकार जीम, रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासाटी परवानगी देईल असं वाटत नाही. तसंच शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. शेवटी हा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.