वृत्तसंस्था // प्रतिनिधी
जय श्री राम हेच बोल बोलणारे, सत्यवचनी रामभक्त निवास भाऊसाहेब पाटील यांचा राममंदिरासाठी केलेला कठोर संकल्प आज पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावातील या निस्सीम कारसेवकाच्या आनंदाला उधाण आले आहे. कारण २७ वर्षांचा त्यांचा अनवाणी प्रवास आता लवकरच थांबणार आहे.
आज संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. राममंदिर भूमीपूजनाचा उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिर भूमीपूजनाचा विधी संपन्न होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रामनामाचा जयघोष होत आहे. असाच आनंद कोल्हापूरमधील या कारसेवकाच्या घरीही साजरा होत आहे. निवास यांनी राममंदिर उभारणी साठी २७ वर्षांपूर्वी एक अनोखा संकल्प केला होता. जो आज पूर्ण होणार आहे. निवास पाटील यांनी १९९२ पासून पायात चप्पल घातले नाही. अनेकांनी त्यांची मस्करी केली. राम मंदिर काही होणार नाही असेही अनेकजण म्हणायचे पण त्यांच्या या संकल्पाला आई वडीलांनी पूर्ण पाठिंबा दिला. राममंदिरासाठी अनेकांनी जीव गमावला त्यांच्या त्यागापुढे तूझा त्याग मोठा नाही. विश्र्वास ठेव राममंदिर होणार असे सांगितले. निवास पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत आणि सध्या रीक्षाही फिरवतात. ते सांगतात ९३ व ९४ साली विनाचप्पल फिरल्याने थोडा त्रास झाला पण आता हे अंगवळणी पडले आहे. आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.