वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आज अयोध्येत राम जन्मभूमीत भगवान रामाच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिपूजन सोहळ्यावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यादरम्यान संजय राऊत म्हणाले की, 'राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे श्रेय कोणीही घेऊ नये. हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरू शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे,' असे राऊत म्हणाले.
पुढे म्हणाले की, 'या कार्यक्रमानंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. आजच्या क्षणाची सर्वच जण वाट पाहत होते. हा क्षण जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा ज्या हजारो लोकांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण आम्ही सर्वप्रथम केले. शरयू नदीचे पात्र कारसेवकांच्या रक्ताने आणि बलिदानाने लाल झाले होते, ते ज्यांनी डोळ्यांनी पाहिले त्याच डोळ्यात आज आनंदाश्रू आहेत. त्यांचा त्याग आणि बलिदान आज खऱ्या अर्थाने कामी आला,' अशी भावना राउत यांनी व्यक्त केली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.