वृत्तसंस्था // प्रतिनिधी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालिन पंतप्रधान कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अयोध्येत गेले, परंतु जन्मस्थानापासून ते दूरच राहिल्याचे दिसून येते. पाच दशकात इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान या नात्याने अयोध्येत आले, परंतु ते जन्मठिकाणी गेले नाहीत.
अयोध्या प्रकरण न्यायालयात सुरू असल्याने तत्कालिन पंतप्रधानांनी जन्मठिकाणी जाण्याचे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराचे भूमिपूजन केले तेव्हा ते जन्मठिकाणी भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६६ रोजी शरयू नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या घाटाचे लोकार्पण केले. पण त्या रामजन्मभूमीकडे गेल्या नाहीत. त्यानंतर त्या आचार्य नरेंद्र देव विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. १९७९ रोजी त्या पुन्हा अयोध्येत आल्या आणि या भेटीत त्यांनी हनुमान गढीचे दर्शन घेतले. राजीव गांधी पंतप्रधान असताना दोनदा अयोध्येत आले.
१९८४ रोजी लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा घेतली. तसेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग त्यांनी फैजाबाद (अयोध्या) येथून फुंकले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८६ मध्ये जन्मूभूमीचे कुलूप उघडणे आणि नोव्हेंबर १९८९ रोजी राम मंदिराचा शिलान्यास झाला होता. १९९० च्या सद्भावना यात्रेनिमित्त राजीव गांधी अयोध्येत आले होते.
केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा दोन्ही पंतप्रधान अयोध्येत आले. अटलबिहारी वाजपेयी २००३ मध्ये अयोध्येत आले होते. पण ते थेटपणे मंदिर कार्यात सहभागी झाले नाहीत. अयोध्येत आंदोलनाचे प्रमुख महंत रामचंद्रदास परमहंस यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिले. तेव्हा त्यांनी परमहंस यांना श्रद्धांजली वाहताना राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल, असे म्हटले होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.