जकराया कारखान्याचा दहावा बॉयलर अग्नीप्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ
जकराया साखर कारखान्याकडून यंदाही जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर देणार असून यंदा सर्वाधिक दराची परंपरा कायम ठेवणार असल्याचे मत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. बी. जाधव यांनी वटवटे (ता. मोहोळ) येथे व्यक्त केले.
येथील जकराया कारखान्याचा दहावा बॉयलर अग्नीप्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहूल जाधव, संचालिका उमादेवी जाधव, जकराया मल्टिस्टेटच्या मुख्याधिकारी मनीषा जाधव, प्रियांका जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ऍड. बी. बी. जाधव होते. प्रारंभी वटवटेच्या सरपंच पद्मिनी काळे व येणकीचे ग्रामसेवक बिरुदेव काळे या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा व अन्य धार्मिक विधी करण्यात आले.
ऍड. जाधव म्हणाले, शेतकऱ्यांना दराबाबत दिलेला शब्द जकरायाने नेहमीच पाळलेला आहे. मागील हंगामातील एफआरपीची ठरलेली दोन हजार तीनशे दहा रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. मला जे तोलता येते तेच मी बोलत असतो. यंदाही सर्वाधिक दराबाबत शब्द दिला आहे, तो नक्कीच पळाला जाईल. शेतकऱ्यांनी चांगला व परिपक्व ऊस गाळपास द्यावा व दराबाबत निश्चित रहावे, असे आवाहन ऍड. जाधव यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कारखान्याला वेळेत ऊस यावा यासाठी तोडणी यंत्रणा प्रभावीपणे राबविली आहे. यासाठी
दोनशे ट्रॅक्टर, पाचशे बैलगाडी, दोनशे डम्पिंग व दहा तोडणी मशीन यंत्राची सोय केली आहे. शिवाय दहा हार्वेस्टर मशिनद्वारे दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
को 265 या ऊस जातीला अपेक्षित उतारा मिळत नसल्याने आगामी 2022-23 सालाच्या गळीत हंगामापासून या जातीच्या उसाचे गाळप न करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला असून केवळ बारा महिन्यात गाळपास येणारा आणि चांगला उतारा देणाऱ्या को 238 आणि को 118 या नव्या जातीचे वाण विकसित करून उसाच्या या दोन्ही वाणाचे बेणे कारखान्याकडून उपलब्ध केले जाणार आहे, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क असे अवाहन सचिन जाधव यांनी केले.
यावेळी जकराया देवस्थानचे पुजारी ब्रम्हदेव पुजारी, बेगमपूरचे माजी सरपंच लक्ष्मण माने, प्रभाकर पाटील, विश्वंभर जाधव, भानुदास गावडे, विठोबा जगदाळे, नागराज पाटील, मिरीचे माजी सरपंच रफिक पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जाधव, प्रमोद जाधव, म्हाळाप्पा पाटील, सागर जाधव, पाराप्पा पुजारी, महिबूब पटेल, किरण सरवळे, केशव सरवळे, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, केमिस्ट डी. एन. आवताडे, डिस्टिलरी मॅनेजर के. सी. कोटकर, प्रशासन अधिकारी जकराया वाघमारे आदी मान्यवर व शेतकरी सभासद उपस्थित होते. प्रस्ताविक विजय महाजन यांनी केले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.