वृत्तसंस्था // प्रतिनिधी
ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.
पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर खरपूस टीका करत सुटले आहेत. पुण्यातील एका मेळाव्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती. “राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी कायम चांगले बोलत आलो आहे. मी आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला शरद पवारांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?,” असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.