वृत्तसंस्था // प्रतिनिधी
केवळ मतदार नोंदणी करुन किंवा व्हॉटसअॅपवरून निवडणुका जिंकता येत नसतात, असे वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले. पुणे पदवधीर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना भाजपची भूमिका समजावून सांगितली पाहिजे. पुणे पदवधीर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सक्षम आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावाही सुजय विखे पाटील यांनी केला.
यंदा महाविकासआघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होत असल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी आम्ही यंदा मोठ्याप्रमाणावर मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा आमचा विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील यांनी हातकणंगले येथील प्रचारसभेत बोलताना महाविकासआघाडीला टोला लगावला. कागदोपत्री किंवा व्हॉटसअॅपवरुन निवडणुका जिंकता येत नाही, असे त्यांनी म्हटले.
हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या इंगवले मळ्यात भाजप मिञ पक्षाचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी ,बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळवा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाविकासआघाडीचे सरकार हे फसवे सरकार आहे. लवकर त्यांना पायउतार व्हावे लागेल. भाजपाची विजयी घोडदौड कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी भाजपाचे नेते जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले , हातकणंगले प्रचार प्रमुख बाळासाहेब गारे ,तालुका अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.