वृत्तसंस्था प्रतिनिधी:- ही श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडत आहोत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिकस्थलळं उघडण्यात येत असल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याच्या सुरू असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा करून दिवाळी निमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं' ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!, असंही त्यांनी म्हटलं आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.