वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा देशभर होऊ लागली आहे. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथं तुम्हाला न्याय मिळत नाही, असे खळबळजनक वक्तव्य माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केले आहे. एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोगोई यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत गोगोई यांच्यावर आरोप केला होता. गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वत:च केला होता, अशी टीका मोईत्रा यांनी केली होती.
यावर गोगोई म्हणाले की, की मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही. गोगोई म्हणाले, की त्या महिला खासदाराला या प्रकरणातील योग्य गोष्टी माहीत नाहीत. त्या वेळी ते प्रकरण मी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे दिले होते, त्यांनी चौकशी समिती नेमली होती.
गोगोई म्हणाले की, आपल्या देशाला पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे, पण आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. जेव्हा संस्थांची कार्यक्षमता कमी होते तेव्हा वाईट अवस्था असते. 2020 हे कोरोनाचे वर्ष होते. त्यात कनिष्ठ न्यायालयात साठ लाख, उच्च न्यायालयात 3 लाख, सर्वोच्च न्यायालयात सात हजार खटल्यांची भर पडली, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कामासाठी योग्य व्यक्ती मिळणे महत्त्वाचे आहे. सरकारमध्ये अधिकारी नेमतात तशी न्यायाधीशांची नेमणूक होत नाही. न्यायाधीशाची पूर्ण काळ वचनबद्धता असते. कामाचे तास निश्चित नसतात. 24 तास काम करावे लागते. पहाटे 2 वाजता आम्ही काम केले आहे. न्यायाधीश सर्वकाही बाजूला ठेवून काम करतात. किती लोकांना याची जाणीव आहे? जेव्हा न्यायाधीश नेमले जातात तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे, असेही गोगोई म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.