सोलापूर // प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणाच्या वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथिल वीज महावितरणच्या कार्यालयासमोर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करणेत आले. यावेळी बहुसंख्येने पंढरपूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील लिंकरोडच्या विभागीय महावितरणच्या कार्यालयासमोर आमदार प्रशांत परिचारक तसेच असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोकले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, सरचिटणीस बादलसिंह ठाकुर, नगराध्यक्ष साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, दिनकरभाऊ मोरे, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, सुभाष मानेसर, पंचायत समिती उपसभापती भैया देशमुख, युवा नेते प्रणव परिचारक, नगरसेवक अनिल अभंगराव, लक्ष्मण धनवडे, हरिषदादा गायकवाड, अरूण घोलप, दिलीपअप्पा घाडगे, गंगामामा विभुते, राजू गावडे, बाळासो देशमुख, विवेक कचरे, अगंतराव रणदिवे, दिनकर नाईकनवरे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, नगरसेविका शकुंतला नडगीरे आदींसह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नगर परिषद व पंचायत समितीचे नगरसेवक व सदस्य मोठ्या संख्येने यानिमित्ताने उपस्थित होते.
गेल्या एक वर्षापासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या आर्थिक फटक्यास सामोरे जावे लागले असल्याने व महाराष्ट्र शासनातील काही मंञी यांनी या अगोदर नागरिकांना वीज बील माफीचे संकेत दिले होते व नंतर त्यांनी युटर्न घेत वीज बीलासंदर्भात नागरिकांची घोर निराशा केली आहे. तर दुसरीकडे नागरिकांनीही या अगोदर वीज बीलासंदर्भात कधी सवलत किंवा वीज बील माफ करण्याची मागणी केली नव्हती परंतु सध्या नागरिकांची या कोरोनाच्या मोठ्या संकटामुळे आर्थिक बाबींचे चक्रच फिरले नसल्याने आर्थिक बाजू पुर्णता कोसळली असल्याने नागरिक स्वतःहून या वीज बीलाबाबत वीज महावितरण महामंडळाकडे व राज्य शासनाकडे ही मागणी करत असुनही नागरिकांच्या या मागणीकडे वीज वितरण व महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याने या नागरिकांचा आवाज मोठा करून त्यांची ही वीज बीलाबाबतची मागणी या झोपेचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी पंढरपूर येथिल लिंक रोडवरील वीज महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यास हजारो नागरिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी आ.परिचारक म्हणाले, विज बिल माफीसाठी सरकारने कर्ज काढायला हवे. यासाठी संपूर्ण विधीमंडळावर विरोधक व विरोधी पक्षांची मान्यता सरकारला दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक हाल कमी करण्यासाठी वीज बिल माफी सरकारने करायलाच हवी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या शासनाने नवीन जीआर काढून खाजगी एंजटव्दारे विज थकबाकी वसुलीबाबत घोषणा केली आहे. त्यामध्ये वसुल झालेल्या सर्वसामान्य नागरीका, शेतकऱ्यांच्या वसुल बिलावर 10% रक्कम त्या एंजटला देणार आहेत. महावितरणकडून शेतकरी बिल भरत नाहीत असे कारणे देत विजेची कामे होत नाही, नवीन ट्रान्सफार्मर मिळत नाही. विज दिवसा न देता रात्री दिल्यामुळे होणाऱ्या दुर्घटनाबद्दलही त्यांनी यावेळी शासनावर कडाडून टीका केली. शासनाने 75 लाख विजधारक म्हणजे 4 कोटी जनते विरूध्द नोटीसा काढल्या आहेत. त्यांची विज कनेक्शन तोडली जाणार आहेत. येत्या काळात 10 वी-12 वीसह पदवीधरांच्या परिक्षा सुरू होणार आहेत. याचा विचार करून शासनाला विनंती आहे की त्यांनी जर एकाही घराचे विज तोडणीचा प्रयत्न केला तर भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरी बांधवासाठी आडवा उभा राहील.
आंदोलनाच्या निमित्ताने आमदार परिचारक यांनी काही घरगुती व संस्थांची वीजबिल देखील दाखवली. यामध्ये एका शाळेला एक लाख रुपये वीजबिल आले , झोपडपट्टीतील घराला 46,000/- चे बिल आले असल्याचे आमदार परिचारक यांनी बिलासह दाखवले. प्रत्यक्षात लॉकडाऊन मुळे शाळा बंद असताना, शाळेला एक लाख बिल कसे येऊ शकते ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी विज महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देणेत आले.
भाजपच्या आंदोलनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी सरकारविरोधी घोषणाने एकच हल्लाबोल महावितरणच्या कार्यालयासमोर झालेला दिसून आला. यावेळी श्री.कटेकर, विक्रम शिरसट, लक्ष्मण धनवडे, सुभाष मस्के, बादलसिंह ठाकूर आदींनी मार्गदर्शन केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.