वृत्तसंस्था // प्रतिनिधी
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,' अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.