महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात दररोज कोरोना बाधित रुग्णांचे नवनवीन आकडे समोर येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहे. त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असताना ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी शरद पवार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील 190 साखर कारखान्यांना पत्र पाठवून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर जे कारखाने बंद आहेत, त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात राज्यात सॅनिटायझरची कमतरता असताना राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती केली होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.