सोलापूर, दि.30: राज्य शासनापाठोपाठ केंद्र सरकार ही कोरोना काळात जनतेच्या पाठिशी आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 या कालावधीतील अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अन्न धान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले.
या निर्णयानुसार सोलापूर शहरातील सुमारे पाच लाख 20 हजार नागरिकांना धान्य मोफत वितरण केले जाणार आहे. अंत्योदय अन्न योजना (पिवळे रेशन कार्डधारक) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी कार्डधारक) यांना प्रती सदस्य तीन किलो गहू आणि दोन तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.
मे आणि जून दोन्ही महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या 25 हजार लाभार्थ्यांना 1500 क्विंटल गहू आणि एक हजार क्विंटल तांदूळ दिला जाईल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 4 लाख 95 हजार लाभार्थ्यांना 29 हजार 700 क्विंटल गहू आणि 19 हजार 800 क्विंटल तांदूळ वितरित केला जाणार आहे. शहरात सुमारे 314 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात धान्य वितरित करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याने सर्वात पहिल्यांदा धान्याची उचल केल्याची माहितीही श्री. समिंदर यांनी दिली आहे.
स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु असून नागरिकांनी धान्य घेण्यास गर्दी करु नये, सुरक्षित अंतर पाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा आवर्जून वापर करावा, असे आवाहनही श्री.समिंदर यांनी केले आहे.
अंत्योदय अन्न योजना लाभार्थी -25,000 -1500 क्विंटल गहू आणि 1000 क्विंटल तांदूळ देणार
प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी-4 लाख 95 हजार – 29 हजार 700 क्विंटल गहू आणि 19800 क्विंटल तांदूळ देणार.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.