सोलापूर // प्रतिनिधी
एक लक्षात घ्या, ते उत्तराला प्रत्त्युतर होते. माझ्या दंड थोपटण्याची चर्चा केली जाते. पण, तुम्ही (भारत भालके ) मोठ्या मालकाला (सुधाकर परिचारक) दंड थोपटले, त्याच्यावर कोणी चर्चा केली का हो. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. आम्ही तो स्वीकारला. पण, राजकारणात एवढी मस्ती आणि एवढी गुर्मी चालत नाही. त्यांनी (भगिरथ भालके) आम्हाला आव्हानं देत बसू नये. कारण, आम्हाला आव्हाने देणारे संपले आणि आम्ही आहोत तेथेच आहोत, हे लक्षात असू द्या, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी भगिरथ भालके यांना प्रत्युत्तर दिले.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर शहरातील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी परिचारक यांनी दंड थोपटले होते. त्याला भगिरथ भालके यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले होते. त्याला परिचारक यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत जिंकल्यानंतर भारत भालके यांनी असाच शड्डू ठोकला होता. त्याला परिचारक यांनी उत्तर दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरून हा कलगीतुरा रंगला आहे.
परिचारक म्हणाले, ‘‘मी थोपटलेले दंड हे उत्तराला प्रत्त्युतर होते. माझ्या दंड थोपटण्याची एवढी चर्चा होते. पण, तुम्ही (भालके) मोठ्या मालकाला (सुधाकरपंत परिचारक) दंड थोपटले, त्याबाबतची चर्चा कोणी केली का हो. निवडणुकीतील जय-पराजय हे मोठ्या मनाने स्वीकारायचे असतात. निवडून आल्यानंतर तुम्ही जर एवढ्या गुर्मीने, मस्तीने आणि माजाने वागत असाल तर राजकारण म्हणजे काय तांबड्या मातीतील कुस्ती नाही.’’
राजकारण हा बुद्धीबळाचा खेळ आहे. कधी प्यादं पुढं करून, कधी उंट पुढं करून, तर कधी वजीर पुढं करून बुद्धीबळात जसे एकमेकांवर हल्ले होतात. तसं राजकारणामध्ये नेहमी शांत डोक्याने, बुद्धीने आणि संयमाने राजकारण केलं पाहिजे. त्याच संयमाने आम्ही आतापर्यंत म्हणजे २००९, २०१४, २०१९ या विधानसभेच्या हरलेल्या निवडणुका असतील किंवा २०१५ मधील माझी विधान परिषदेची जिंकलेली निवडणूक असेल आम्ही त्याच पद्धतीने संयमाने राहिलो. पण, दुर्दैवाने त्यावेळी विरोधकांची जी भाषा होती, प्रतिक्रिया होती, ती अत्यंत खालच्या पातळीवरील होती. राजकारणात एवढी मस्ती, एवढी गुर्मी चालत नाही, असा टोला परिचारक यांनी भालके यांना लगावला.
ते म्हणाले की प्रत्येक ठिकाणीच तुम्ही लढलं पाहिजं, हातात शस्त्र घेतलं पाहिजं, असंही काही नसतं. राजकारणात शस्त्रापेक्षासुद्धा, लढाईपेक्षा बुद्धीचं बळंसुद्धा मोठे काम करू शकते. मनात ठरवलं की आपण काय करू शकतो, ते आम्ही २०२१ च्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं आहे. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार ३० ते ४० हजार मतांनी निवडून यायला पाहिजे होता. तिथं तुम्हाला आज पराभव स्वीकारावा लागला.
पराभव झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, पराभव स्वीकारा. आव्हानं, प्रतिआव्हानं ही आम्ही १९७० पासून गेली ४०-५० वर्षांपासून स्वीकारत आलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला आव्हानं देत बसू नयेत. कधी युक्तीने, कधी शक्तीने ही लढाई आम्ही खेळत आलो आहोत. आम्हाला विरोध करणारे संपले आहेत, आम्ही आहोत तिथंच आहोत आणि तिथंच राहाणार आहोत, असे आव्हानंही परिचारक यांनी आपल्या विरोधकांना दिले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.