करमाळा प्रतिनिधी :- ( विजय निकत ) तालुक्यातील व राज्यांतील रेशन दुकानदार यांना कोरोना विमा संरक्षण व पोलीस पाटील यांच्या प्रमाणेच भां.द.वी.कलम ३५३ लागू करून अधिकार कक्षेत घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सतीश नीळ पाटील व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पुजारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री नीळ पाटील व पुजारी यांनी निवेदनात म्हटले आहे की,गेल्या वर्षी पासून देशात व राज्यात कोरोना सारख्या भयानक साथीच्या रोगाने थैमान घातले आहे, अशा वाईट काळात रेशन दुकानदार यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून शासकीय आदेश मानून व स्वस्त धान्य दुकानदार हा शासनाचाच एक भाग म्हणून स्वस्त धान्य वाटप केले आहे व करत आहेत.
याशिवाय आज ही राज्यात कोरोना रोगाची तीव्रता कमी अधिक प्रमाणात चालूच आहे. अश्या गंभीर परिस्थितीत रेशन दुकानदार हे समाजातील गोरगरीब जनतेसाठी स्वतः चा जीव धोक्यात घालून स्वस्त धान्य वाटप करत आहेत. त्यामुळे गावांतील कोरोना बाधित रुग्णांचा सातत्याने संपर्क येत आहे. त्यामुळे राज्यातील बरेच रेशन दुकानदार व मापाडी कामगार यांना कोरोना रोगाचा संसर्ग होऊन मृत पावले आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी गावातील काही राजकीय पुढारी व गाव गुंड लोक आमच्या रेशन दुकानदार बांधवांना धमकी देऊन, बेकायदेशीर रित्या याला माल दे, त्याला माल दे अशी वारंवार धमकी देत असतात, विनाकारण तुझ्या दुकानाची तक्रार करणार आहे असे म्हणत असतात. त्यामुळे रेशन दुकानदार हा पण महसूल विभाग यांचाच एक भाग असल्याने पोलीस पाटील यांना जसे भां.द.वी. कलम ३५३ अन्वये अधिकार कक्षेत घेतले आहे तसेच राज्यातील सर्वच रेशन दुकानदार व मापाडी यांना या कायद्या अंतर्गत संरक्षण द्यावे व कोरोना विमा संरक्षण कवच द्यावे अन्यथा रेशन दुकानदार बांधव यांना या भयानक परिस्थितीत मृत्यूस समोर जावे लागणार आहे. तसेच कोरोना रोगाने मृत पावले आहेत. अशा रेशन दुकानदार यांच्या नावावरील परवाना त्यांच्या नातेवाईक यांच्या नावे तात्काळ वर्ग करून द्यावा व कोरोना काळात प्राथमिक उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना, करणे व साधन सामग्री खरेदी करण्यासाठी किमान २००० रू विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे. निवेदनात शेवटी म्हटले आहे की, आमच्या वरील विविध मागण्या तात्काळ मंजूर करून रेशन दुकानदार बांधवांना आधार व न्याय द्यावा अशीही विनंती केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री,गृह मंत्री , सर्वच पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी/शिवसेना पक्ष/भारतीय जनता पार्टी/अखिल भारतीय कॉंग्रेस पक्ष ,विभागीय महसूल आयुक्त,महसूल विभाग पुणे, जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना ईमेल द्वारे पाठविलेल्या आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.